Anirudhha Shirke Header

मन जिंका जग जिंका…

मन म्हणजे, प्रत्येक माणसाला लाभलेले अजस्र, अफाट वरदान. ज्यावर स्वार होऊन सबंध विश्वात कुठेही सहज रपेट मारून येऊ शकतो. अगदी उत्तरधृव ते दक्षिणधृव प्रवास काही सेकंदात करता येतो. या मनाची अचुक नाडी ओळखुन त्यावर अंकुश ठेवता आला की जग जिंकल्याचा आनंद मिळतोच.

लहान मुले स्वछंदी, चंचल मनाची असतात. एखाद्या प्रसंगात मुले कशी वागतील हे त्यांच्या मनस्थितीवरून सहज ओळखता येते. मुल केवळ त्रागा करते, ऐकत नाही असे म्हणुन अंग झटकणया ऐवजी त्यांची मनस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे. अगदी सोपा उपाय म्हणजे आपण त्या प्रसंगात कसे वागलो असतो हा विचार करणे, त्यानंतर त्यांची भुमिका समजावून घेणे. समोरच्याच्या मनाची स्थिती समजली की अनेकदा आपल्याला हवी असलेली उत्तरे सहज सापडतात, नात्यांतील सुसंवाद टिकतो.

जुई एकुलती एक मुलगी. अभ्यासात हुशार. शिवाय तिला नृत्य, खेळ सगळ्याचीच आवड. पण अचानक ती आई वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारेनाशी झाली, अभ्यासातील प्रतिसादही कमी झाला. तिच्या आवडी, निवडी बदलु लागल्या, वागण्यात तुसडेपणा वाढला. तिच्या आईच्या चाणाक्ष नजरेने मुलीमधील होणारे बदल हेरले. तिने माणसोपचार तज्ञांची मदत घेतली. त्यांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ” ती व्यक्त होत नव्हती, तिला व्यक्त होण्यासाठी भावंडाची कमतरता जाणवत होती.” ते आता शक्य नसल्याने व मुलीचे वय वाढल्याने, आता आईनेच तिची मैत्रीण होण्याची गरज निर्माण झाली होती. आईने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुलीची मैत्रीण म्हणुन जे काही बदल करता येतील ते करण्याचा प्रयत्न तिने केला. साहजिकच मुलगी खुलली. अभ्यास आणि खेळ या दोन्हीत छान प्रगती दिसु लागली. मुलांची कोवळी मने जिंकत राहिले की आयुष्यातील बदल सहज शक्य होतात.

निलेश तसा नाईलाजानेच इंजीनियर झाला, खरे तर त्याची आवड वेगळीच होती. पुढे बायकोही इंजीनियर मिळाली. अचानक थेट अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली. भारतातून निघताना आई, भाऊ, कुटुंब यांना सोडुन जाण्याचा प्रसंग आला की याचे ढसाढसा रडणे सुरू. ‘मला जावेसे वाटतच नाही’, ‘कशासाठी मी इंजीनियर झालो’. हे त्याचे उदगार मन व्यथित करून जातात. परंतु उज्वल भवितव्यासाठी काही दिवस जाऊ असे तो मनाला सांगुन वेळ निभाऊन नेत असतो. भावनिक प्रसंग हाताळतांना मनावर दगड ठेवावाच लागतो.

चाळीशी, पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या अनेक मनांना तर वाटते आपण पुन्हा एकदा लहान व्हावे, असलेली बंधने झुगारून स्वछंद बागडावे, मस्तपैकी जीवनाचा आस्वाद घ्यावा. यातुन अनेक मने प्रयत्न करतात काही यशस्वीही होतात. काही पाण्यात फक्त पाय ओले करावे त्याप्रमाणे कधीतरी थोडीफार बंडाळी करतात. काही बेडका प्रमाणे छोट्याशा विहिरीतच उड्या मारत राहतात. खरेतर झुरलेलया, थकल्या भागलेलया मनाला उभारी देण्यासाठी किमान काही प्रयत्न तरी निश्चित करायला हवे.

उतारवयात मनाचे खरया अर्थाने साम्राज्य असते. निवृत्तीमुळे भरपुर रिकामा वेळ, कमी झालेल्या जबाबदारया, तुटलेला संवाद, दुरावलेले नातेसंबंध, जीवनसाथीने अचानक सोडलेली साथ अश्या एक ना अनेक गोष्टी कारणीभूत असतात. रिकामा वेळ, रिकामे मन कुठे गुंतवावे हे ठरविणे आवश्यक आहे. टिव्ही मालिका, पेपर यांची दिवसातील काही वेळच सोबत असणे उत्तम. परंतु उपलब्ध वेळेचा, अनुभवाचा योग्य विनियोग केला, थोडक्यात मनाला गुंतवून ठेवले की अनेक उत्तम परिणाम साधता येतात. शरीर कितीही थकले तरी मनाने जर उभारी घेतली तर चमत्कारही घडतात.

मनावर, आचरणावर ताबा नसलेली व्यक्ति कुटुंब व समाज दोन्हीसाठी धोकादायक. मनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून त्याला उत्तम विचार, छान संस्कार यांचे खतपाणी घातले की ते उत्तम फुलते. सुदृढ मन उत्तम वैयक्तिक व सामाजिक आरोग्याची चावी असे म्हटले तर वावगे ठरू नये.

अनिरुद्ध शिर्के ….