Anirudhha Shirke Header

गणपती बाप्पा मोरया ..

(गुप्तहेर दुनियेची एक सफर)
शब्दांकन : अनिरुद्ध शिर्के

दुपारचे दोन वाजले होते. गणपतीची प्रतिष्ठापणा, आरती, नंतर जेवण होऊन सचिन बसलाच होता की, फोन वाजला. पलिकडुन आवाज आला ” हॉटेल गुडलक कॅफे, ५ नंबर टेबल, संध्याकाळी ४ वाजता”. फोन कट झाला. सकाळपासुन सचिन या फोनची वाट पाहत होता. २५ जानेवारीला संध्याकाळी सहाच्या सुमारास चांदणी चौकात चार जणांची निर्घृण हत्या झाली होती. तब्बल ७ महिने झाले तरी पोलीसांना मारेकरी अथवा खुनाचे कारण सापडले नव्हते. पोलीसांवर दबाव वाढला होता. दिघे साहेब, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा यांनी सचिनला बोलावून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहण्यास सांगतले होते.

सचिनचा व सरांचा तसा जुना परिचय होता. सरांनी अनेकवेळा सचिनला मदत केली होती. सचिनही त्यांना लागेल ती मदत करायचा. या केसचा काहीच निकाल लागत नाही म्हटल्यावर सरांनी चाकोरीबाहेर जाऊन सचिनची मदत घ्यायचे ठरवले होते. सचिन कामाला लागला. त्याने बावधन पोलीस स्टेशनला केस बद्दल काही माहिती मिळते का ते बघितले. खुनाच्या जागेवर जाऊन आला, घटनास्थळाचे फोटो बघितले. पण फारसे काही हाती लागले नाही. मयत व्यक्ती कोण होत्या याबद्दल देखील काहीच उपयुक्त माहिती नव्हती.

परवाच, परत एकदा फाईल बघताना त्याच्या लक्षात आले. पोस्टमार्टम अहवालामध्ये मयत व्यक्तीने मृत्युपुर्वी चहा सारखे पेय पिले असण्याची शक्यता वर्तवली होती. त्याने तडक दिपकला फोन केला. दिपक म्हणजे एकदम खवय्या. त्यात कोथरूड, बावधन परिसराची त्याला खडानखडा माहिती. दिपकने जवळपासच्या २,३ चहाच्या ठिकाणांची नावे सांगितली. सचिन तिथे पोहोचला. जवळपास सगळीच दुकाने मुख्य रस्त्याला होती. तिथे त्याने चौकशी केली. पण दिपकने सांगितलेली नंदूची टपरी बंद होती. नंदु कुठे गेला कोणालाच माहिती नव्हते. त्याने आपले खबऱ्यांचे नेटवर्क जागे केले. आता मोहीम होती नंदूचा शोध. त्यासंदर्भातच त्याच्या खबऱ्याचा फोन आला होता.

सचिन अधिकचा विचार न करता आवरून निघाला. गुडलकच्या बाहेर गाडी लावली, आत जाऊन बसला. बन मस्का, स्पेशल चहाची ऑर्डर दिली व खबऱ्याची वाट पाहू लागला. खबरी आला, परंतु काही न बोलता कोपऱ्यावरच्या टेबलावर जाऊन बसला. त्याने इशाऱ्यानेच ५ नंबर टेबलकडे बोट दाखवले व तो तडक बाहेर पडला. त्या ५ नंबर टेबलवर बारीक अंगकाठीचा, वाढलेली दाढी व अंगात फुलांच्या नक्षीचा निळा शर्ट घातलेला एक इसम, दोन्ही पाय एकमेकांवर दुमडुन, अंंग चोरून बसला होता. तो घाबरलेला दिसत होता. सचिन त्याच्यासमोर जाऊन बसणारच होता, परंतु त्याची शोधक नजर पाहून थांबला.

बराच वेळ झाला. त्याची भिरभिरणारी नजर दरवाजाच्या दिशेने वळली. डोळ्यांवर चष्मा, अंगात काळे जाकेट, काळी पँट घातलेला एक माणूस त्याच्या टेबलजवळ आला. दोघे काहीतरी कुजबुजले. त्या चष्म्यावाल्याने आपल्या जवळची पिशवी पुढे सरकवली. त्या निळ्या शर्ट वाल्याने ती स्वतःकडे घेतली. तो चष्मा घातलेला माणूस तडक बाहेर पडला. निळा शर्ट वाला उठणारच होता की, सचिन त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. ” नंदु वर्पेला ओळखतोस का?” सचिनचा प्रश्न.

ते नाव ऐकताच, तो चमकला. “काय झालं ? काय काम आहे ? माझं नाव कसे माहिती? ” असे त्या निळ्या शर्ट घातलेल्या माणसाने विचारले. “म्हणजे तुच नंदु वर्पे आहेस तर. मला सांग, २५ जानेवारीला तुझे दुकान चालु होते का?” सचिनने थेट मुदयालाच हात घातला व त्याच्या समोर बसला. लागोपाठ प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यावर नंदु काय ते समजला. तो चांगलाच घाबरला होता. त्याने आजुबाजुला पाहिले व अचानक शेजारून जाणाऱ्या वेटरला सचिनच्या अंगावर धक्का देऊन, तो दरवाजाच्या दिशेनं पळाला. सचिनही मागे पळाला.

नंदु पिशवी बगलेत धरून, रस्त्यावरून वेडावाकडा पळायला लागला. चौकातुन फर्ग्युसनच्या दिशेने सुसाट सुटला. सचिनही त्याच्यामागे पळत होता. नंदुचा त्या प्रकरणाशी नक्कीच काहीतरी संबंध असणार, अशी त्याची खात्री पटली. आशेचा किरण समोर दिसत होता. नंदुचे पकडले जाणे व त्याच्याकडुन माहिती मिळणे जास्त महत्वाचे होते. दोघांचे पळणे चालुच होते. नंदु रस्त्याच्या डावीकडून वैशाली हॉटेलच्या दिशेने रस्त्यावर आला. सचिनने वेग वाढवला. एवढ्यात एक वेगवान गाडी आली व तिची नंदुला धडक बसली. नंदु रस्त्याच्या उजवीकडे फेकला गेला. गाडी नंदुजवळ जाऊन थांबली, माणसे जमा होऊ लागली. सचिन रस्ता पार करून तिकडे पोहोचणारच होता की, ती गाडी निघुन गेली. गर्दीला बाजु करून सचिन नंदुजवळ पोहोचला. नंदु रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जोरदार धडक बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला होता. सचिनचे डोके सुन्न झाले. हातात आलेली संधी हुकली होती. त्याने नंदुकडे होती, ती पिशवी शोधण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुला पाहिले, परंतु ती पिशवी नव्हती. गर्दीतील कोणी उचलली असेल का? ती गाडी थांबली, त्या माणसांनी तर नेली नसेल ना? पण कोणाला विचारावे तर प्रकरण अंगाशी आले असते. एव्हाना गर्दीतील कोणीतरी पोलिसांना फोन लावला. आता अधिक वेळ न थांबता निघणे योग्य राहील असे सचिनला वाटले. तो हताशपणे घरी निघाला.

आज सचिनच्या घरी गौरीच्या उद्यापनाची तयारी चालु होती. नैवेद्य तयार होत होता. दिघे साहेबांचा फोन येऊन गेला होता. साहेबांनी ‘तुझे काम चालू ठेव’ असे सांगितले होते. तितक्यात सचिनचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने फोन उचलला. पलिकडुन आवाज आला. ” सचिन साहेब, चांदणी चौक बाबतीत, तुमच्यासाठी एक खास खबर आहे. संध्याकाळी ५ वाजता डेक्कन बस स्टॉपला भेटा.” सचिन विचारात पडला. त्याच्या नेहमीच्या खबऱ्यांपैकी कोणाचाही आवाज नव्हता. इतक्या अचूकपणे माहिती सांगणारा कोण असेल? त्याला माझे नाव, नंबर कसा माहित? अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते.

गौरीपुजन, जेवण उरकल्यावर तो बाहेर पडला. ठीक पाच वाजता तो डेक्कन बस स्टॉपवर हजर होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. ‘डावीकडे येवले अमृततुल्यला या. दोन चहा सांगा’. सचिन तडक दुकानात शिरला. नेहमीप्रमाणे दुकानात गर्दी होती. दोन चहाची ऑर्डर दिली. दोन कप समोर आले. त्याने एक उचलला. तेवढ्यात एक जण मागुन आला व त्याने दुसरा उचलला. सचिनने मान वळवली तर ‘बाहेर या’ असे तो म्हणाला. अंगावर कुडता, निळी जीन्स, पायात शुज, पिळदार मिशी, डोक्यावर वाढलेले केस अश्या पेहरावातील, साधारणतः पन्नाशीतील एक जण पुढे जाऊन बाजुला थांबला. सचिन शेजारी जाऊन उभा राहिला.

“तुम्हाला काय वाटते नंदु कसा गेला ?” त्याने विचारले. सचिनही भांबावून गेला. “नेमके काय म्हणायचंय?” सचिनचा प्रतिप्रश्न. “नंदुला उडवला. तुम्हाला त्याची बॅग नाहीच सापडली ना. कशी सापडणार म्हणा ? ज्यांनी दिली त्यांनीच नेली.” सचिनला झटकण डोळ्यासमोर सगळे आठवले. या माणसाकडे एवढी माहिती कशी काय? हा प्रश्न मनात आला. त्याने न राहवून विचारलेच. ” तुम्हाला या प्रकरणाची बरीच माहिती आहे असे वाटते. आपली ओळख?”.

“ते सोडा. जे घडलय, ते चांगल्यासाठी घडलय. तुम्ही तो नाद सोडा. तुम्ही एक चांगला माणुस म्हणुन सांगितलं.” तो माणूस चहाचा घोट घेत म्हणाला. सचिनचे समाधान झाले नाही. “हे पहा. मी केस हातात घेतली की, त्याचा सोक्षमोक्ष लावतोच. समाजात सर्रास असे गुन्हे घडायला लागले तर अंदाधुंदी माजेल. आपण काय नुसते गप्प बसायचे?… मी काही शांत बसणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. पोलीस प्रशासन आपले काम करेल. पण आपलेही काही कर्तव्य आहे ना. मी तुमच्या धमक्यांना भिक घालणार नाही”. सचिनचा पारा वाढला होता.

हा हा .. तो माणूस हसला. “पोलीस… अहो साहेब, सगळे पोलीस नीट वागले असते तर देश कधीच सुधारला असता. हं आता, दिघे साहेबांसारखे असतात काही चांगले ऑफिसर. पण त्यांनाच लोक त्रास देतात. आता तुम्हीच बघा, या केसला किती महिने झाले? सात.. काही सापडलं.. नाही… तुमच्या दिघे साहेबाला किती टेंशन आलंय. आता त्यांनी तुमची मदत घेतली. कुठतरी साहेबालाही माहिती आहेच की, कस आहे ते …तुमचं … पोलीस प्रशासन…” तो उपहासात्मक बोलला. सचिनला काही ते आवडले नाही. त्यात दिघे साहेबांचा विषय निघाला त्यामुळे तो शांत होता.

तो आता शांततेतच बोलला. “खरेतर, मला तुझी कीव वाटते. एवढी माहिती असुनही गुन्हेगारांना अजुन पकडुन दिले नाहीस. तुच तर त्यांना सामील नाहिस ना.” सचिनच्या आवाजातली वाढलेली धार, हे त्या माणसाने लगेच ओळखले. चहाचा कप बाजुला ठेवत तो म्हणाला, “तुम्ही एक काम करा. इक्बाल मामु कोण आहे ते शोधा. तुम्हाला सगळा उलगडा होईल.”

“इकबाल कोण इकबाल..त्याचा काही ठावठिकाणा? ..कसा दिसतो?…काय करतो? कुठे भेटेल?…काहीतरी सांग.” सचिनने झटकण प्रश्न टाकले. “साहेब, इकबाल एक टायरवाला आहे. म्हणजे पंक्चरचा धंदा नावापुरता..बाकी. .. बाकी तुम्ही हुशार आहात. काळजी घ्या.” तो माणूस एवढे बोलून निघाला व गर्दीत गायब झाला.

सचिन पुर्ण विचारात पडला. अगोदर नंदु, आता इकबाल…नेमका काय प्रकार आहे? आणि या टायरवाल्याला कसे शोधणार? लगेच त्याला आठवला, त्याचा खास मित्र तबरेज भाई. व्यवसायिक, मोठा जनसंपर्क असणारा, यारों का यार, एकदम देशभक्त माणूस. त्याने लगेच फोन लावला. प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगितले. “भाई, तु घाबरू नको. थोडा वेळ दे. काम हो जाएगा”. तबरेजचे ते शब्द ऐकून सचिनला धीर आला. तबरेज शब्दाचा पक्का माणूस. त्यामुळे तो निर्धास्त झाला होता.

सकाळी दहा वाजता सचिनचा फोन वाजला, तबरेजचा होता. “हॅलो, भाई ये तो अलगही किस्सा है ! हा बंगाली म्हणुन सांगतो पण मुळ बांगलादेशी आहे. दोन वर्षांपूर्वी कोथरुडला आलाय. टायरचे दुकान आहे. गावावरून कामाला पोर घेऊन येतो. वैसे तो, सबसे एकदम अच्छा बातचीत करता है । लेकीन मुझे कुछ ठीक नही लग रहा है । फॅमिलीत कोणी नाही. आता एक मोठा फ्लॅट पण घेतला आहे. जर कोणी नाहीतर मोठा फ्लॅट कशाला घ्यायचा? ” तबरेजने योग्य मुद्दा मांडला होता आणि माहिती तर भन्नाट काढली होती. सचिनला आकाश ठेंगणे झाले होते. त्या दिवशी गुडलक मध्ये इकबालच होता का? याच्या टीमनेच तर त्या चार माणसांना मारले नसेल ना? हे विचार मनात चालू होते तोच “भाई, उसका क्या करने का ?” तबरेजच्या प्रश्नाने तो भानावर आला.

“कुछ नही, मी सांगतो तुला. मला जरा वेळ दे. त्याचा पत्ता पाठवुन दे आणि थँक्स हा भाई. तु एवढी माहिती काढलीस.” सचिन चेहऱ्यावर स्मितहास्य आणत म्हणाला. “बस क्या भाई !! तु असे नको बोलुस. मित्रांसाठी आपुण कधीपण रेडी आहे. फक्त तु एकटा नको जाऊ. प्रॉब्लेम होऊ शकतो. काळजी घे. आणि हो, ते तेवढे मोदक पाठवुन दे.” तबरेज हसत म्हणाला. “नक्की रे ” म्हणत सचिनही मनापासून हसला. तबरेजच्या माहितीने वेगळीच उकल झाली होती परंतु अजूनही ठोस माहिती हाती लागली नव्हती. दिघे सरांना सांगु की नको हा विचार मनात येत होता. पण तबरेजने सांगितल्याप्रमाणे एकटे न जाता काळजी घेणेही आवश्यक होते. खुप विचार केल्यावर त्याला कांहीतरी आठवले. चटकन त्याने फोन हातात घेतला.

“हॅलो, बोल ना मित्रा” पलिकडून आवाज आला. तो सचिनचा पोलीस अधिकारी मित्र विशालचा आवाज होता. सचिनने काय हवे ते सांगितले. विशालने तत्काळ होकार दिला. आणखी एक मित्र युवराजला बोलव असेही सांगितले. विशाल त्याचा अजुन एक सहकारी सोबत घेणार होता. सचिनने एकटे न जाता टीम बनवुन इकबालला गाठायचे ठरले.

वेळ सकाळी ११. इकबालच्या दुकानासमोर सचिन पोहोचला. दुकानात ८-१० टायर पडलेले होते. हवा भरायचा कॉम्प्रेसर, पंक्चर काढायचे साहित्य, हवा भरायचा पिवळा पाईप असा पसारा पडला होता. दुकानात तीन कारागिर होते. त्यांच्या दिसण्यावरूनच ते बांगलादेशी वाटत होते. दुकानातच गडद निळया रंगाचा, भरपुर मळालेला शर्ट, निळी पँट व डोक्यावर जाळीदार टोपी घालून एक जण एका लाकडी काउंटरवर टायरला पॅच लावण्याची तयारी करत होता. त्याच्या वागण्यावरून तोच इकबाल असावा हा अंदाज आला. एव्हाना विशाल, त्याचा सहकारी हे ही तिथे बनावट ग्राहक बनुन पोहोचले. युवराज दुकानाच्या पलिकडे चहा टपरीच्या बाकड्यावर बसला होता. “टायर में हवा भरणा है” सचिनने आवाज दिला. त्या मुलांपैकी एकाने तोंडात माव्याचा बकाणा असल्याने हातवारे करून दोन मिनिटे थांबायला सांगितले. तोपर्यंत सचिन इकबाल शेजारील खुर्चीवर जाऊन बसला.

“आज बहुत भीड है ? क्या बात है?” सचिनने सुरवात केली. “हा, असते ना या वक्ताला. ” त्याचे मराठी शब्द ऐकून सचिन चमकला. “अरे वा!! तुम्हाला छान मराठी येते की” सचिनने असे बोलताच तो म्हणाला “पुण्यातच जन्मुन मोठा झालो भाऊ. मराठी येणारच ना.” तबरेजने दिलेली माहिती व याचे सांगणे यात विरोधाभास होता. “तुम्ही कोणत्या शाळेत होता?” सचिनने पटकन प्रश्न विचारला. तसा तो व त्याचे कारागिर चमकले. सचिन, विशाल दोघांनाही ते जाणवले. पक्क्या पुणेरी प्रश्नाने ते घडले होते. “येच अपना, गाव मधील म्युनिसिपल शाळा…. ये अब्दुल, इनका काम जल्दी निपटा दे.” त्याने विषयाला बगल दिली होती.

सचिन ताडकन उठून उभा राहिला व त्याच्याजवळ जाऊन म्हणाला “कोणती म्युनिसिपल शाळा, इकबाल? पुण्यातली की बांगलादेशची?” इकबाल डोक्यात वीज चमकावी असे स्तब्ध झाला. परत भानावर येत “काय बोलताय? कोण हाय तुम्ही? ये बांगलादेशी कोण बोला? और तुमको, मेरा नाम कैसे मालुम?” तो मागे सरकला. “अरे इकबाल, माझ्याकडे तुझा सगळा कच्चा चिठठा आहे. तु पुण्यात कधी आलास? सारखे नवनवीन बांगलादेशी पोर आणतोस. नंतर ते कसे,कुठे गायब होतात. दुकान, फ्लॅट खरेदी सगळी माहिती आहे. अगदी …चांदणी चौकात काय झाले ते ही” सचिनने सगळा इतिहास, वर्तमान एका मिनिटात मांडला. ते ऐकताच इकबाल हात खिशात घालणार, तोच विशालने त्याला जोरात लाथ घालून खाली पाडले. विशालच्या मित्राने पटकन एका कामगाराला ताब्यात घेतले. इकबालचे इतर दोन कामगार पळुन जाणार तोच, युवराजने त्यांना एका फटक्यात जमिनीवर लोळवले व मानगुटीला धरून दुकानात घेऊन आला.
 
“बोलतोस आता की, करू मोकळी.. ” विशालने त्याच्या कानशिलावर बंदुक ठेवत विचारले. काही वेळ पोलीस खाकया दाखवल्यावर इकबालने सांगितलेले अजब होते.

इकबाल मुळचा बांगलादेशी होता. त्याला अनधिकृतरित्या भारतात आणले गेले होते. त्याला दिलेले काम तो करत असे. बांगलादेशातुन मुले त्याच्याकडे पाठवली जात. कुठुन तरी भरपुर पैसेही येत. त्याने त्या मुलांना पंक्चरचे काम शिकवायचे आणि फोन येईल तेव्हा तिकडे त्यांना पाठवायचे. ती मुले पुढे काय करतात? ते त्याला माहित नव्हते. चांदणी चौकात मारले गेलेले ते चौघे, इकबालकडेच कामाला होते. नंदुच्या खोलीवर त्यांना रहायला मिळाले होते. नंदुला दारूची सवय होती, त्यामुळे त्याची त्या चौघांशी मैत्री झाली. त्या हत्याकांडाच्या दोन दिवस अगोदर त्यांना दोन बॅग देण्यात आल्या होत्या. त्यात भरपुर दारूगोळा, स्फोटके होती. २६ जानेवारीला धमाका करण्याचा त्यांचा डाव होता. नंदुने ती बॅग पाहिली व तो घाबरला. तो रात्रीच, कोणालाही काही न बोलता गावाला निघून गेला होता. त्यामुळेच त्याचे दुकान बंद होते. त्यांना सात महिन्यानंतर नंदुचा पत्ता लागला होता. नंदुच्या हत्येच्या अगोदर त्याला खुप पैसे देतो असे सांगुन, गावावरून इकडे बोलविण्यात आले होते. नंदुला गरज होतीच, म्हणुन तो आला होता. त्या दिवशी गुडलकच्या बाहेर त्यांची माणसे होतीच. नंदुला सगळे माहिती आहे व तो सापडला जाईल, असे वाटल्याने त्यांनीच नंदुला उडविले होते. पैशाची बॅगही परत घेऊन पळुन गेले होते. त्यांच्या मार्गातील काटा दुर झाला होता.

एवढे सगळे ऐकल्यावर सचिनला एक एक उकल होऊ लागली. ते अनधिकृत बांगलादेशी होते म्हणुन पोलीस फाईलला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. वाईट संगतीने नंदुचा हकनाक बळी गेला होता. पण मग, त्या चौघांना कोणी मारले? हे गुढच होते. सचिन पुन्हा चिंतेत पडला. दिघे सरांच्या आदेशाप्रमाणे पुढील चौकशीसाठी इकबाल व टीमला गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आले. युवराज, विशाल व त्याचा मित्र यांच्यामुळेच हा देशद्रोही पकडला गेला होता.

आज अनंत चतुर्दशीचा दिवस होता. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची तयारी चालु होती. एवढे दिवस खुणाचा मास्टरमाइंड शोधणाऱ्या सचिनच्या मनात त्या गुन्हेगारांना मारणारा कोण ? हा प्रश्न येत होता. तेवढ्यात फोन वाजला. अनोळखी नंबर, पलिकडुन तोच आवाज “साहेब अभिनंदन, इकबाल सापडला ना.” सचिनने कॉल रेकॉर्डिंगवर टाकला आणि जरा नाराजीतच म्हणाला “पण, खरा खुनी सापडलाच नाही”.

“अहो, खुनी काय म्हणता. देशभक्त म्हणा. अश्या अतिरेकी लोकांना गोळ्या घालूनच मारायला हव. हे कुठुन येतात काय आणि आपल्या लोकांना मारून जातात काय. कशाचाच पत्ता लागत नाही. आपण काय फक्त मरण्यासाठीच जन्माला आलो का ? आपल्या समाज व्यवस्थेतही यांना कळत नकळत मदत करणारे अनेक लोक आहेत. काही कागदी नोटांच्या आमिषापोटी देशाशी गद्दारी करतात. यांना काहीच लाजा वाटत नाही. अश्या सगळ्या नराधमांना ठोकुनच टाकले पाहिजे. आपण कोणीही असू, एक आर्मी ऑफिसर, जीप ड्रायव्हर अथवा एक देशभक्त आपण देशासाठी लढु शकतो हे महत्वाचे. बाकी कायदा, तुमचे पोलीस प्रशासन काय करेल याची मला फिकीर नाही. आजपर्यंत अश्यांना पकडुन काही सापडले नाही याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना मदत करणारे लगेच उभे राहतात. त्यामुळे आम्ही आमचे काम करणारच.” तो एकदम पोटतिकडीने बोलत होता. त्याचे विचार तो मांडत होता. सचिनला बरेच मुद्दे सापडले होते. तेवढ्यात कॉल कट झाला. सचिनने ताबडतोब ते संभाषण दिघे सरांना पाठवले व कॉल केला. दिघे सर ते ऐकुन सचिनच्या कामावर खुश झाले. आता सर, यावर ताबडतोब कार्यवाही करून या माणसाला पकडण्यासाठी टीम लावतील असे सचिनला वाटले.

सर म्हणाले “सचिन तू खूप मोठे काम केले आहेस. तुझे कौतुक व्हायलाच हवे. अतिरेकी गोटाला सामील असलेला इकबाल सारखा माणूस सापडला. ते चौघे कोण होते व का मारले गेले ते कळाले. इकबालने शस्त्रे कुठे लपुन ठेवली आहेत ते सांगितले आहे. आता राहिला तो अनोळखी माणूस. त्या माणसाच्या बोलण्यात जरा तथ्य आहे रे. आता हेच बघा ना. आमच्या टीमलाही हे सगळे शोधता आले असते. परंतु नाही जमले. आणि समजा एखाद्याला काही हाती लागले की तथाकथित पुढारी, पत्रकार, वकील आहेतच. आम्ही केलेला तपास कसा खोटा आहे हे सांगायला. कधीकधी तर मन इतके विषन्न होते ना की, वाटते हे असे देशभक्त परवडले. कायदा हातात घेतात पण काय ते सोक्षमोक्ष तरी लावतात. कुणाला उत्तर देणे नाही आणि चांगले काम केले तरी शिव्या खाणे नाही. चल जाऊ दे. तु कोणाला काही बोलु नकोस. बघु नंतर काय ते. आता बंदोबस्ताला जायचे आहे “. सरांसारख्या ईमानदार माणसाची निराशा स्पष्ट जाणवत होती.

संध्याकाळी सचिनचा फोन वाजला. परत अनोळखी नंबर. तोच आवाज “काय सचिनराव? काय म्हणाले दिघे साहेब… आम्हाला शोधायचा श्रीगणेशा करताय की… गणपती बाप्पा मोरया..” सचिनला हसु आले तो म्हणाला “गणपती बाप्पा मोरया..हा हा “. तो माणूसही खळाळुन हसला व फोन कट झाला.

सात महिने काहीच धागेदोरे हाती न लागणाऱ्या केसचा निकाल गणरायाने अकरा दिवसात लावला होता. गणपती बाप्पा मोरया 🙏 !!

समाप्त.