Anirudhha Shirke Header

देऊ त्यांना साथ…

शब्दांकन: अनिरुध्द शिर्के

कालच पंकज सांगत होता, “तुला माहित आहे का दरवर्षी ३ डिसेंबरला ‘जागतिक अपंग दिन’ साजरा केला जातो. २००१ च्या गणनेच्या आधारे, भारतात विविध वर्गवारीनुसार जवळपास २ करोड लोक अपंग आहेत. एका देशाच्या दृष्टीने हा आकडा मोठा आहे. २०१६ साली अपंगत्वाच्या २१ नवीन बाबी नमुद करून नवीन सुधारित कायदा अस्तित्वातही आला. परंतु देशाच्या अर्थसंकल्पात त्याला जेष्ठ नागरिकांसोबत जोडून तुटपुंजी आर्थिक तरतूद केली जाते रे.” तो पोटतिकडीने सांगत होता. मी अचंबित होऊन ऐकत होतो. त्याने सांगितलेली माहिती माझ्या डोळ्यात अंजन घालणारी होती. खरे पाहता, आपल्याकडे अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच चिंताजनक आहे. काही ठराविक घटनांमध्ये मिळणारा कौटुंबिक आधार सोडता बाकी ठिकाणी यांना उपेक्षाच सहन करावी लागते.

आता हेच बघा ना, आपण कोणतीही वास्तु उभारताना या लोकांचा साधा विचारही करत नाही. त्यांना किती इमारतीत वैयक्तिक पातळीवर, कुणाचीही मदत न घेता सहज प्रवेश करता येतो? याचे उत्तर: बहुधा हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच असेल. असे किती खाजगी कार्यालये आहेत, जिथे यांना पात्रता असताना सहजपणे काम करू दिले जाते ? खरेदी तर माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक भाग. कधी विचार केलाय कि या व्यक्ती किती दुकाने, मॉलमध्ये सहज खरेदीला जाऊ शकतात. या व अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे नैराश्य निर्माण करणारी आहेत.

त्याउलट परदेशांमध्ये त्यांना असणारा समाज आधार खुप मोठा आहे. कार्यालये, दुकाने, प्रेक्षणीय स्थळे सगळीकडे त्यांना विशेष प्रवेश देतात, त्यांच्यासाठी सोयीसुविधाही उपलब्ध असतात. आपण त्यांना समाजातील एक घटक म्हणून स्वीकारणे, त्यांचा विचार करणे व त्यांना सन्मानजनक वागणुक देणे आवश्यक आहे.

अभ्यासांती असे लक्षात आले की, बऱ्याच व्यक्तींना अपघातानेही अपंगत्व आलेले असते. एखाद्या घटनेने, आजाराने अचानक आयुष्य बदलुन जाते. अशा वेळी आपण कुणावर अवलंबुन आहोत हि कल्पनाच माणसाला असह्य होते. त्यात माणूस मनाने खचला कि अवघड होते. अश्या वेळेस त्यांना फक्त प्रेम व आधार आवश्यक असतो. मग त्यांच्यातील लढवय्या जागा होतो व लढू लागतो.

मला आठवते, मी इंजीनियरिंगला असताना, मला 2 वर्ष सिनिअर मुलगी पायाने अधु होती. बस स्टॉप ते काॅलेज साधारणतः १.५-२ किमी अंतर होते. ती रोज, स्वतःला संभाळत, रस्त्याने जाणारी अवजड वाहने चुकवत ते अंतर पार करत असे. कॉलेजच्या आवारात एका ठिकाणाहुन दुसरीकडे जाणे, जिन्यावर चढ उतार करणे किती त्रासदायक असेल याची कल्पना करणेही शक्य नाही. पण तिला कधीही तक्रार करताना पाहिले नाही. तिने जिद्दीने इंजीनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. पुढे त्या त्याच कॉलेजला प्राध्यापक झाल्या. एकाही लेक्चरला कधीही उशीरा आल्या नाहीत. आज त्या त्याच कॉलेजमध्ये विभाग प्रमुख आहेत. याचा अर्थ या व्यक्ती कष्टाळू असतात. फक्त त्यांना संधी मिळायला हवी.

परवा दुचाकीवर भाजी बाजारात गेलो होतो. एका हातात हेल्मेट, दुसऱ्या हातात पिशवी, तोंडाला मास्क, खिश्यात सॅनिटायझर, पैशाचे पाकीट, मोबाईल, गाडीची चावी. ‘एकावेळी आपण किती गोष्टी सहज सांभाळू शकतो ना’ असा विचार करत जरा मस्तीतच फिरत होतो. समोर डोक्यावर टोपी, पांढरा सदरा व पायजमा घातलेला एक भाजीविक्रेता जोरजोरात ओरडत होता. त्याच्या समोर भरपूर गर्दी होती. ‘भरपूर गर्दी म्हणजे चांगली भाजी असणार’ या विचारांना नमन करून गर्दीतून वाट काढत, त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो आणि थबकलो. तो भाजीवाला एक हाताने अधु  होता. त्याने तब्बल ८-१० प्रकारच्या भाज्या समोर छान पद्धतीने मांडून ठेवल्या होत्या. तो एकटाच होता व केवळ त्या एकाच हाताने ग्राहकांना भाजी छान पध्दतीने कागदी पिशवीत भरून देत होता, हिशेब करीत देवाणघेवाणही करत होता. त्याला पाहून मला जगप्रसिद्ध हंगेरियन नेमबाज कॅरोली आठवला, पठठयाने केवळ एकच हात असूनही ऑलंपिक सुवर्णपदकांची लयलूट केली होती. मी त्या भाजीवाल्याला आनंदाने सलाम केला. त्याला कळाले नाही परंतु त्याने खडतर परिस्थितीत हार ना मानता कसे लढत राहावे याचा पाठ घालून देताना माझी मस्तीही उतरवली होती.

गावाला माझे एक सहकारी आहेत, सैन्यात होते. सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झाले, डावा पाय निकामी झाला. पुढे निवृत्ती पत्करली व गावाला आले. घरची परिस्थिती नाजुक होती. शेती होती परंतु तीही कोरडवाहू. त्यांनी हार मानली नाही. जिद्दीने कामाला लागले. मजल दरमजल करत शेती नीटनेटकी केली, शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केली, शेळीपालनाचा जोडधंदा सुरु केला. काही वर्षापुर्वी डाळिंबाची लागवड केली. नुकताच त्यांचा फोन आला होता. “साहेब, आपली डाळिंब दुबईला गेले बर का” या त्यांच्या वाक्याने नकळत सारा भूतकाळ आठवला, डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “लाथ मारीन तिथे पाणी काढीन” ही म्हण विसरून “लाथ नसली तरी ध्येय गाठीलच” असे काहीसे म्हणावेसे वाटले.

समाजातही अशी प्रेरणा देणारी अनेक माणसे आहेत. सातारा जिल्ह्यातील पोलियोमुळे अपंग झालेले, एका बांगड्या विकणाऱ्या आईचे लेकरू प्राथमिक शिक्षक झाले. पुढे जिद्दीने UPSC परिक्षेत यश मिळवुन झारखंडचे कलेक्टरही झाले. रमेश घोलप त्यांचे नाव. प्रतिकुल परिस्थितीत झगडुन यश संपादन करता येते याचे ज्वलंत उदाहरण.

आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील. अगदी मैदानी स्पर्धेतही अनेक दिग्गज खेळाडु आहेत. ऑलंपिक गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी दिपा मलिक, बॅडमिंटन मध्ये ब्रांझ पदक मिळविणारी मानसी जोशी अथवा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी अरुनिमा सिंन्हा एकापेक्षा एक सरस रत्नांची खाणच आहे.

अशी जिद्दी, कष्टाळू, ध्येयवादी माणसे आपल्याही आजूबाजूला असतील. कदाचित त्यांना, त्यांच्या प्रयत्नांना आपले मार्गदर्शन, सल्ला, मदत याची गरज असेल. या व्यक्ती स्वाभिमानी असल्याने त्या स्वतःहून आपली व्यथा मांडणार नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करा, तुमचे दोन शब्द, तुमची मदत, पाठीवर कौतुकाची थाप याचा त्यांना आधार वाटेल हे नक्की. मग तेही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील.

एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य आठवले…”जे आपल्या बाहेर आहे ते नाही, तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते.”

समाप्त.

आपला एखादा प्रयत्न, अनुभव जरूर कळवा.

2 thoughts on “देऊ त्यांना साथ…

Comments are closed.