Anirudhha Shirke Header

अभिजीत शिर्के – एक पर्व

शब्दांकन : अनिरुद्ध शिर्के

श्री. अभिजीत सोपान शिर्के हे भारतीय वंशाचे आधुनिक शास्त्रज्ञ “Technology Man” या बिरुदावलीने प्रसिद्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या महत्वपुर्ण योगदानाने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडविला जाऊ शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांनी आपल्या कार्याने युवा पिढीसमोर ‘प्रेऱणादायी व्यक्तिमत्व’ उभे केले आहे.

बालपण

अभिजीत शिर्के यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९७६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील माध्यमिक शाळेत शिक्षक, तसेच हाडाचे शेतकरी होते. आई गृहिणी व घरीच खाजगी शिकवणी घेत असे. आमचे कुटुंब मुळचे निंबवी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा. वडिलांच्या नोकरी निमित्त पुणे इथे स्थायिक झाले. अभिजीत हे घरातील जेष्ठ अपत्य, त्यांच्या नंतर मी (अनिरुद्ध ) व अतुल अशी आम्ही तीन भावंडे. पुण्यात आईवडिलांचा संसार अगोदर सांगवी इथे सुरु झाला. नंतर ते खडकी इथे आले. माईणकरांचा वाडा व त्यात विविध धर्मीय शेजारी असलेले आम्ही भाडेकरू. भारतातील जवळपास सर्वच जातीधर्म, त्यांचे सण, विधी, संस्कार त्या वाड्यात आम्हाला नकळत समजत गेले.

पुढे आईवडिलांनी मोठे धाडस करून मांगल्य सोसायटीमध्ये दोन बीएचके फ्लॅट घेतला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. आम्हा तीनही भावंडांचे शालेय शिक्षण आलेगावकर हायस्कुल येथे झाले. दादा लहानपणापासुन चुणचुणीत मुलगा. वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा यात त्यांचा सहभाग ठरलेलाच. आज कोणाही लहानथोरांशी कुठल्याही विषयावर अचूकपणे बोलून आपला मुद्दा मांडण्याचे त्यांच्या कौशल्याची मुहूर्तपेढ बहुधा त्याच काळात रचली गेली होती.

वडिलांचा शेतीचा व्यासंग, त्यामुळे शनिवार, रविवार ते गावाला जायचेच. जमेल तेव्हा त्यांच्यासोबत दादांची स्वारी निघायची. उन्हाळी व दिवाळी सुट्टी तर गावाला ठरलेलीच. बहुधा यामुळेच शेतीविषयी गोडी निर्माण झाली असेल. दादांनी तर वयाच्या १५व्या वर्षी शेतीतील सर्व ज्ञान आत्मसात केले होते. दादा अगदी कोवळ्या वयात, शेतात पिकवलेला भाजीपाला घेऊन भल्या पहाटे अहमदनगर बाजारात जात. दादांनी शेतमाल विकतानाही उत्कृष्ट दर्जाचा शेतमाल, योग्य प्रतवारी, आकर्षक पॅकिंग हे गुणसूत्र अवलंबविले होते. विसापुरला भरणाऱ्या रविवारच्या आठवडे बाजारात तर ग्राहक आमच्या मालाची वाट पाहत थांबत. आम्हाला बैलगाडीतुन भाजी घेऊन भर उन्हात जावे लागत असे. ग्राहक, बाजार, विक्री कौशल्य याचे बाळकडू दादा स्वतः शिकत व आम्हालाही शिकवत.


कुटुंब

आमचे वडील, सोपानराव शिर्के नावाप्रमाणेच संत व्यक्ती. नोकरी, शेतीची आवड सांभाळुन सगळ्यांच्या अडीनडीला धावून जाणारा देवदूतच. कष्टाळु वृत्ती, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा हे वडिलांचे गुण दादांनी अचुक हेरले आहेत. दादांच्या प्रत्येक कार्याचे त्यांना प्रचंड कौतुक. ते नेहमीच दादांच्या सोबत खंदे समर्थक म्हणुन उभे ठाकले. वडिलांच्या आजारपणात दादांनी वडिलांची केलेली सेवा एका आदर्श मुलाचे उदाहरण आहे. दुदैवाने १७ मार्च २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तो दादांसाठी खुप मोठा धक्का होता. त्यातुन त्यांना सावरण्यासाठी बराच काळ जावा लागला.

आमची आई मंगल शिर्के, अतिशय हुशार, प्रचंड मेहनती, संयमी. समोर आलेल्या बिकट परिस्तिथीने खचुन न जाता, त्याला सामोरे जाऊन कुठल्याही संकटाचा धीरोदात्तपणे सामना करणारी व्यक्ती. आईचा हाच गुण दादांच्या ठायी दिसतो. इतर कुठल्याही दागिण्यांपेक्षा माझी मुलेच माझी अनमोल दागिणे आहेत, हे आई निक्षुन सांगायची. आईच्या विचारांचे, वर्तवणुकीचे पडसात पुढील पिढीवर नक्कीच पडतात. आम्हां भावंडांमधील मोजक्या उत्तम गुणांच्या संस्काराचे श्रेय आईलाच जाते.

आमच्या मातोश्रींचे वडील कै. सुदामराव भांगे, प्राथमिक शिक्षक सोबत उत्कृष्ठ लेखक. दादांनी त्यांचे वाचन, लिखाण, संभाषणकला, कथाकथन हे गुण अचूकपणे घोटवले.

आमचे आजोबा (वडिलांचे वडील) कै. नारायणराव शिर्के म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ते ब्रिटिशकालीन फौजेत होते. अभिजित दादांची व अण्णांची (आजोबा) खास मैत्री. नारळाच्या झावळ्यांपासून खराटे बनवणे, शिलाई मशीन चालवणे, बियाणे तयार करणे, झाडांवर कलमे करणे शिवाय त्याकाळी प्रचलित असणारी शेती औजारासाठी लागणारे लाकडी फाळ व इतर साहित्य बनविण्यात अण्णांचा हातखंडा. दादांनी या सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या, शिकल्या, आत्मसात केल्या. अभिजीत शिर्के या व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म निरीक्षण व कोणतेही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची कला याची मुहूर्तपेढ रोवण्याचा तो काळ होता.

या सर्व प्रवासात दादांना पत्नीची भक्कम साथ आहे. त्यांच्या दोन्ही चुणचूणीत मुली वडिलांपासुन सतत शिकत असतात.


कारकीर्द सुरुवात

मशरूम

सतत प्रयोग करीत राहणे हा दादांचा अजून एक व्यासंग आहे. अगदी लहानपणापासुन त्यांनी हा व्यासंग जपला आहे. शेती असो वा महाविद्यालय अथवा व्यवसाय, ते सतत काही तरी नाविन्यपुर्ण प्रयोग करीत असतात. विज्ञान प्रदर्शनांतुन सहभाग नोंदवणे हे त्यांनी कायम जपले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात “मशरूम तंत्रज्ञान” यावर संशोधन करून जिल्हा व राज्य स्तरावर पारितोषिके पटकाविले आहेत.

पदवी नंतर त्यांनी मार्केटिंग क्षेत्रात काम मिळविण्याचा प्रयत्न केला. घरोघरी जाऊन पुस्तके, वह्या, चमचे, खेळणी विकण्यासाठी ते धडपडू लागले. नुकतेच पदवीधर झालेल्या व्यक्तीस हा फार कठीण काळ असतो. तुमचे ज्ञान, संस्कार, संयम, जिद्द साऱ्यांचीच कसोटी लागते. बऱ्यापैकी पैसे मिळत होते परंतु दादांचे काही मन रमेना.

त्यांनी “National Research Center for Mushroom, Solan” इथे “मशरूम उत्पादन” विषयात प्राविण्य मिळविले. ‘मशरूम उत्पादन हा एक प्रमुख व्यवसाय होऊ शकतो’, हा तरूणांकरिता संदेश घेऊन देशभर प्रशिक्षण शिबिरे घेतली व एक मार्गदर्शक म्हणून ते उदयास आले. स्वतःच्या शेतात मशरूम फार्म बनविला. स्वतःच उत्तम दर्जाचे मशरूम बियाणे उत्पादन व विक्री चालू केली. आमच्या आई वडिलांनी त्यांना भक्कम साथ दिली. पुढे मशरूमवर प्रक्रिया करून उत्पादने बनविण्यास चालू केले.

व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले. संशोधनवृत्ती कायम ठेऊन नवनवीन उत्पादने विकसित केली. भरपूर काम, लेख, चर्चासत्रे, व्याख्याने हा दिनक्रम होऊन बसला. माजी केंद्रीय मंत्री कै. मोहन धारिया यांनी त्यांचे कौशल्य हेरले. ‘वनराई’ संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक रोजगार निर्मिती हि एक चळवळ बनली. यातून ‘अळिंबीची लागवड‘ या पुस्तकाचा जन्म झाला. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्सझांडर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाले. पाठोपाठ व्हिडिओ कॅसेट व सीडी हि प्रकाशित झाल्या.


बायोकेयरची सुरुवात

कोणतेही उत्पादन विकताना मार्केटिंग फार महत्वाचे असते. श्री. विजय गाढवे यांच्या सोबत “बायोकेयर” नावाने नवीन कंपनी सुरू केली. प्रसिद्ध डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. पराग संचेती, डॉ. के व्ही शाह यांच्या उपस्तिथीत बायोकेयरचे रोपटे लावण्यात आले.

एनर्जी क्षेत्र

शेतीतील आवड सतत नवीन काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत होती. पारंपरिक शेती परवडत नाही हे लक्षात येऊ लागले. पेट्रोल, डीझेलचे दर वाढतात मग शेतमालाचे का नाही हा प्रश्न दादांच्या मनात थैमान घालू लागला. मी हि त्यांना साथ द्यायची ठरविले. नोकरी सोडून त्यांच्या सोबत व्यवसाय करू लागलो. पेट्रोल, डिझेलचे उत्पादन घेता येईल अशी पिके घ्यायचे निश्चित केले.

जेट्रोफा वनस्पतीची लागवड मोहीम सुरु केली. सामुहिक शेती सदराखाली बँक ऑफ महाराष्ट्र सोबत ३०० कोटी रुपयांचा करार केला. संपुर्ण भारतात जेट्रोफा-बायोडिझेल इंधन निर्मिती या क्षेत्राबद्दल प्रचार व प्रसार झाला. देशातील सर्वात मोठी नर्सरी पुण्यात निर्माण केली गेली. जेट्रोफाची लागवड हे मिशन मोठया प्रमाणात राबविले गेले. टिश्यू कल्चरच्या सहाय्याने हायब्रीड जाती तयार करण्यात आल्या. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, नायजेरिया, केनिया, टांझानिया आदी देशातील व्यावसायिक व देश प्रतिनिधी यांच्यासोबत भेटीगाठी, चर्चासत्रे व प्रायोगिक पथदर्शी प्रकल्प यांची निर्मिती केली. सर्वोत्तम शास्त्रज्ञ म्हणुन अनेक राष्ट्रप्रमुखांपर्यंत “अभिजीत शिर्के” हे नाव पोहचले. २००८ मध्ये इंडोनेशिया मधील बाली इथे झालेल्या “Jatropha world Summit” चे अध्यक्ष स्थान अभिजीत शिर्के यांनी भूषविले.

याचदरम्यान बायोडिझेल निर्मितीचा प्रकल्प हि सुरु केला. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिवहनच्या बसेसमध्ये बायोडिझेलच्या वापराने वाहनातील प्रदूषण घटवू शकतो हे सिद्ध केले. या प्रयत्नांची दखल CIRT (केंद्र सरकार) यांनी घेतली. पुढील काळात “बायोडीझेलचा वाहनात वापर” आदी विषयांवर सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक व्याख्याने CIRT ने आयोजित केली. “वनस्पतीतेलाचा बायोडीझेलसाठी वापर” सारख्या विषयावरील समितीवर काम करण्याची संधी दिली. अभिजीत शिर्के हे उत्तम व्याख्याते आहेत असा अधिकाऱ्यांचा सूर बरेच काही सांगून जातो.


अध्यात्म

घरात लहानपणापासुन आईची शिकवण व संस्कार पाठीशी होते. अध्यात्माची गोडी त्यांना घरीच लागली. कीर्तन, भजन, कथा ऐकणे व सांगणे या दादांच्या आवडत्या गोष्टी. वेळ मिळाला कि तीर्थस्थानी जाणे, हे दादांचे ठरलेलेच.

मंदिर असो व चर्च, गुरुद्वारा, विहार, दर्गा दादा सर्व ठिकाणी भेट देतात. प्रत्येक धर्माचे ज्ञान समजुन घेण्याचा प्रयत्न करतात. “वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीला अनुसरून, आपण सर्व धर्माचे लोक एकाच कुटंबाचे घटक आहोत. हाच त्यांचा कायम संदेश असतो. जात, धर्म, पंथ, वर्ण असा कधीही भेदभाव त्यांनी केला नाही. समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव हा एकाच मूलमंत्र ते कायम जपतात.

अनेक वर्षांपासुन आठवड्यातील एक दिवस ते प्रार्थना दिवस म्हणुन पाळतात. सामाजिक कार्यात सर्वधर्मीय लोकांना आवर्जुन सहभागी करून घेतात. धर्मांमधील द्वेष, भांडणे त्यांना अजिबात मान्य नाही. आपण सर्व ईश्वराची मुले आहोत. योग्य मूल्यांचा अंगीकार करून जगात शांतता राखा हीच शिकवण ते समाजाला देत असतात.

सर्व धर्मियांना एकत्र घेऊन सर्व धर्मांची जगातील मोठी प्रार्थना मंदिरे उभी करायची, हे त्यांचे ध्येय आहे. मानवता हा एकच धर्म आहे हे जगाला पटवून देणे हे आदयकर्तव्य समजून ते प्रयत्न करीत आहेत.


कामाचा विस्तार

काम पुढे वाढवत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. अजून कुठले असे पीक शोधावे कि ज्यापासून इंधन निर्मिती करता येईल. “शोधले कि सापडते” या उक्तीला अनुसरून बायोमासचा पर्याय सापडला. मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा कच्चा माल. ठरले तर, बायोमासपासून तेल निर्मितीचे ध्येय डोळ्यसमोर ठेवले. आधी ५ली प्रती तास उत्पादन देणारी छोटी मशीन बनविली. परंतु या संशोधनावर अनेक प्रश्न उभे राहिले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य आहे का ? जागतिक व्यवसायिक स्तरावर याचे उत्पादन घेता येईल का ? पुन्हा दादांचा संशोधक जागा झाला. त्यांनी थेट नेदरलँड गाठले. युरोपियन मानांकने (EU Standard) असणारे मशीन बनवायचे ठरले. श्री. रॉब यांनासोबत घेऊन, २०१५ साली शेतीच्या टाकाऊ मालापासून तेल निर्मिती करणारा जगातील पहिला मोबाईल प्लांट बनवला. १० फेब्रुवारी २०१५ ला डच पार्लमेंटमध्ये या संशोधनाबद्दल गौरवोउद्गार काढण्यात आले. कौतुकाची थाप पाठीवर पडली होती, दादांच्या साहसी मनाला उभारी देणारा प्रसंग होता तो.

जगाभरातून कौतुक झाले. अनेक राष्ट्र हे तंत्र मिळावे म्हणुन संपर्क करू लागले. व्यावसायिक ऑफर देऊ लागले. पण अभिजीत शिर्के यांच्यासमोर देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी व देश दिसत होता.

दादांनी आपण हे तंत्रज्ञान आपल्या देशातच ठेवू असे निक्षुन सांगितले. देशातील इंधन आयात थांबावी व रोजगार निर्मिती व्हावी ही त्यांची प्रबळ इच्छा आहे. शेतीच्या टाकाऊ मालापासून तयार केलेल्या तेलावर पुढील प्रक्रिया करणे आवश्यक होती. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांसोबत संशोधन करार करून हरीत डिझेलची निर्मिती करण्यात आली. तसेच या तेलापासून हरीत प्लास्टिक, पॉलिमर, मोनोमर, रबर या पदार्थांचीही निर्मिती करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, गॅस, केमिकल अशा विविध शाखा विकसित होत आहेत. शेकडो उत्पादने बनविण्याची समीकरणे तयार आहेत.


सन्मान

२४ मे २०१८ रोजी नेदरलँडचे मा.पंतप्रधान मार्क रूट, मा. उपपंतप्रधान कॅरोला स्काउटण व त्यांचे शिष्टमंडळ भारतात आले होते. त्यांच्या उपस्तिथीत श्री. अभिजीत शिर्के बी श्री. रॉब यांच्या प्रकल्प सहकार्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

अनेक देश त्यांच्या देशांचा GDP बदलण्यासाठी त्यांना आमंत्रित करू लागले आहेत. “Technology Man” हि ओळख जगासमोर येऊ लागली आहे.