पप्पा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…..

शब्दांकन: अनिरुद्ध शिर्के

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |

अहमदनगर जिल्ह्यातील श्रिगोंदा तालुक्यातील निंबवी सारख्या छोट्याशा गावातुन एक तरूण मोठया बंधुच्या आग्रहाखातर शिक्षणासाठी पुण्यात येतो. नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतो व एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करतो. आपल्या कष्टाळू व प्रामाणिक वृत्तीने शून्यातून विश्व निर्माण करतो परंतु आपली गावासोबत असलेली नाळ काही तुटू देत नाही. आयुष्यात सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही आपले पाय जमिनीवर ठेऊन नम्रतेने आपले कर्तव्य बजावत या जगाचा निरोप घेतो….प्रेम, करूणा,जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, यांनी ओतप्रोत भरलेला सच्चा मित्र, मार्गदर्शक, गुरू, आधारवड असे आपले बहुरंगी जीवन समाजाला एक खुले पुस्तक म्हणुन उपलब्ध करून देणारे आमचे वडील श्री. सोपानराव शिर्के उर्फ काका यांचे जीवन खुपच प्रेरणादायी होते.

त्यांचे नाव घेताच भारदस्त आवाज, काटक शरीर, व हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतो.

त्यांचे प्राथमिक शिक्षण निंबवीतील भैरवनाथ विदयालय येथे झाले. फार मोठे व आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंब, गावातील पहिली दुमजली माडी असलेला वाडा, पंचक्रोशीत व्यापार असणारे प्रचंड उलाढाल असणारे दुकान असा वारसा लाभला तर माणसाच्या अंगी अवगुणांचा संचार होण्यास वेळ लागत नाही परंतु याही परिस्थितीत आदर्श गुणांचा अंगिकार करून, सर्व प्रलोभनांपासुन दुर राहुन स्वतःचे वेगळेपण जपणे हे केवळ संत प्रवृतीचे लोकच करू शकतात. पप्पा हे असे जीवन जगले, त्यांचे नावही संताचे होते त्यामुळे हा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

पुढे शिक्षणासाठी मिलटरी बॉईज होस्टेल, अहमदनगर, आलेगावकर शाळा, स. प. महाविद्यालय, नगर कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अश्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण, व सोबत खेळाची प्रचंड आवड असल्याने कॉलेज, विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केलेले असे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी जोपासले होते. त्यांच्या शालेय, कॉलेज जीवनातील मित्रांना याची नक्कीच आठवण येत असेल.

ज्या शाळेत शिकलो तिथेच म्हणजे आलेगावकर माध्यमिक विदयालय, खडकी येथे शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा दुर्मिळ बहुमान त्यांच्या वाट्याला आला होता. त्याचवेळी सैन्यदलात भरती होण्याची संधीही चालून आली होती परंतु शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देऊन पुढील पिढींना मार्गदर्शन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. स्पष्टवक्तेपणा, निर्भिडवृत्ती यामुळे ते सहकारयांमध्ये जाणले जात. एखादा सहकारी अडचणीत आहे हे कळाले की मदतीस तत्परतेने हजर हा मैत्रगुण त्यांनी आयुष्यभर जपला. आपले सहकारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाशीही सौदार्हयाचे संबंध त्यांनी जपले. आयुष्यात आलेली माणसे उगाच आलेली नसतात त्यामागे नक्कीच काहितरी कारण असते आपण केवळ ॠणाणुबंध जपण्याचे काम करावे हीच त्यांची विचारसरणी होती.

शाळेत विद्यार्थी वर्गामध्ये त्यांच्याविषयी आदरयुकत भिती नेहमीच जाणवत असे. त्यांच्यासमोर उभे राहणे म्हणजे ‘चुकीला माफी नाही’ हे विद्यार्थांना पक्के ठाऊक होते. चुक झाली की धपाटा घालणारा त्यांचा हात कौतुकासाठीही तितकाच तत्परतेने पाठीवर पडत असे. मग समोरच्याच्या चेहर्यावर हास्य व अभिमान सहजपणे येत असे. एकदा शालेय शिक्षण पुर्ण झाले की ते समोरच्या विद्यार्थ्याला प्रेमपुव॔क मैत्रीची वागणुक देत. अगदी त्याच्या आई-वडिलांपासुन मुलाबाळांपर्यंत सर्वांची आपुलकीने चौकशी करत असत. वेळप्रसंगी सल्लाही देत. आम्हा तिनही भावंडांचेही शिक्षण ते शिकवत असलेल्या आलेगावकर विदयालय मध्येच झाले. परंतु स्वतःची मुले म्हणून आम्हाला त्यांनी कधी वेगळी वागणूक दिली नाही. इतर मुलांबरोबरच एक विद्यार्थी म्हणुनच वागविले. वरवर सोपे वाटणारी ही गोष्ट तशी किती अवघड असते हे एका शिक्षकालाच माहित. खरेतर सापत्न वागणुक त्यांना कधी जमलीच नाही.

आजच्या गतीमान जीवनात नाती जपणे तसे अवघडच. त्यात प्रचंड गोतावळ्यात शहरात नोकरीची तारेवरची कसरत करून नाती जपणे हे फक्त सोपानकाकांनाच जमते… हे त्यांच्याशी संबंधित सर्वच नातेवाईकांचे उदगार त्यांच्या वेगळेपणाची पावती देतात. चुलते, भाऊ,बहीणी, मेव्हणा, मेव्हणी, भाचे, भाची, पुतणे, पुतणी ही नाती जपताना त्यांनी कधीच सख्खा, चुलत, मावस हा भेदभाव केला नाही. त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटत. प्रत्येकाची त्यांच्यासोबत एक घट्ट मैत्री ठरलेलीच. प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणे हा त्यांचा स्वभावगुण. सर्वांच्याच मनात त्या आठवणी उचंबळून येत असतील ..कोणाचाही कोणताही कार्यक्रम असो त्यांची उपस्थिती ठरलेलीच. कार्यक्रमास पोहोचण्यास उशीर झालेला त्यांना आवडत नसे. वेळेवर उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य आहे हा त्यांचा आग्रह असे. कार्यक्रमास उपस्थित सर्वांची गाठभेट घेतल्याशिवाय तिथुन हलायचे नाही हा शिरस्ता त्यांनी कायम जपला.

अनेक वर्ष शहरात राहुनही गावाविषयी त्यांची आस्था, ओढ कधीही तसूभरही कमी झाली नाही. त्यांना गावाविषयी किती आत्मियता होती हे त्यांना भेटालेलया प्रत्येक व्यक्तीस ठाऊक आहे. कुठल्याही राज्यास, देशास भेट दिली की त्यातील कुठली चांगली गोष्ट आपण गावासाठी करू शकतो याबद्दल ते नेहमी चर्चा करत. गावातील कोणीही व्यक्ती कुठेही भेटो अथवा त्याबद्दल माहिती मिळो त्यांना प्रचंड आनंद व्हायचा. गावची ओढ आणि शेती विषयक आवड, यामुळे गेले कित्येक वर्ष, तोट्यातील शेती त्यांनी पुणे शहरातून येऊन जाऊन आवडीने केली.

सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान खुपच वेगळेपण जपणारे होते. कुठलाही मोबदला अपेक्षित न धरता ते समोरच्याला मदत करीत असत. एखाद्याचे नोकरी विषयक काम असो, आर्थिक अडचण असो वा लग्न स्थळ सुचविणे असो त्यांनी नेहमीच समर्पित भुमिका बजावली. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा होता. त्यांचा स्वभाव खुप सहजसुंदर व वेगळा होता हे त्यांना ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे उदगार असतात.

समाजातील अनेक घटकांना वैद्यकीय उपचार परवडत नाहीत. यासाठी त्यांना अल्पदरात उपचार उपलब्ध करून देता येतील का, यावर बराच काळ विचार विनिमय करून, स्वतःच्या नावाची सामाजिक संस्था उभारून एक अभ्यासपुर्वक संकल्पना मांडण्यात त्यांनी निर्णायक भुमिका बजावली आहे. पुढील काळात त्याची फळे आपणांस दिसु लागतील.

पप्पांनी त्यांच्या आईवडिलांच्या उतारवयात केलेल्या सेवेची तुलना श्रावणबाळाशी केली तर गैर ठरू नये. आपल्यापैकी अनेकांनी ते स्वतः अनुभवले आहे. आपले वय, पद, प्रतिष्ठा यांचा मुलाहिजा न बाळगता मुलाने आपले कर्तव्य कसे बजावावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले होते. माझ्या भावंडांनीही त्यांची अहोरात्र केलेली सेवा हे त्याच संस्कारांचे प्रतिक आहे.

आमच्या आईने त्यांना म्हणजे आपल्या पतीला, आलेल्या प्रत्येक संकटात, बिकट परिस्थितीत फारच खंबीर साथ देऊन, प्रसंगी खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा उत्तम रितीने चालविला. तिने त्यांची केलेली सेवा याचे शब्दात वर्णन केवळ अशक्यच आहे. आजच्या युगात पतीची अशी सेवा करणारी पत्नी दुर्मिळच म्हणावी लागेल. आज तिचा मोठा आधार गेला आहे परंतु त्यांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी ती झटुन प्रयत्न करेल यात शंका नाही.

अभिजीतदादाचे त्यांना फारच कौतुक असे. त्याच्या व्यवसायाच्या सुरवातीपासून ते खंबीरपणे त्याच्यासोबत उभे ठाकले. दादाची दुरदृष्टी, अभ्यासूवृत्ती, कष्ट करण्याची तयारी याचा त्यांना फार अभिमान वाटे. दादा हा काळाच्या फारच पुढे विचार करतो, रोजजीवन जगणारया व्यक्तीस त्याचे विचार लगेच पटत नाहीत परंतु नंतर ते पटतात असे ते नेहमी म्हणायचे.

अतुल घरातील शेंडेफळ असल्याने त्याच्याशी वेगळाच संवाद करत. काळजी व मार्गदर्शन दोन्हीचा तो मिलाफ असे. त्रिवेंद्रम येथे त्याने विक्रमी वेळेत क्रिकेट व फुटबॉलचे स्टेडियम उभारले हे सांगताना त्यांचा ऊर भरून आलेला असे व चेहरयावर अभिमान ओतप्रोत भरलेला असे.

तिनही सुना यांच्याशी त्यांचे नाते खुपच मनमोकळेपणाचे होते. एखाद्या विषयावर कोणीही सल्ला दिला की ते त्याचा विचार करीत असत. पाचही नातवंडे यांच्याशी त्यांचे वेगळेच मैत्रीचे नाते होते. नातवंडांचा हट्ट पुरविण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.

माझे माझ्या वडिलांशी अनेक पदरी नाते होते…बाप-लेकाचे, गुरु-शिष्याचे, संस्थेच्या सह-संचालकाचे, मैत्रीचे ….पावलोपावली आम्हाला घडवणारे माझे वडील ..माझ्या आयुष्यातील होस्टेलमधील पहिला दिवस, पहिला विमान प्रवास सगळ्याचेच ते साक्षीदार होते. ते मला नेहमी सांगत….प्रयत्न करीत राहणे हे आपले कर्तव्य आहे, ते करीत रहा, कदाचित सगळेच मनासारखे घडणार नाही परंतु प्रयत्न केल्याचे समाधान निश्चित मिळेल….

कळायला आणि वाचता यायला लागले तेंव्हापासून “शिर्के सरांचे चिरंजीव” ही बिरूदावली आम्ही मिरवु लागलो. आज इतर कितीही उपाधी मिळाल्या तरीही ही ओळख मिरविण्याचा आमचा हक्क कायम अबाधित राहिल.

खरेतर त्यांच्या अकाली निधनाने पायाखालची जमीनच सरकली आहे. वडिलांची साथ असते तोपर्यंत जग वेगळे भासते परंतु ते सोबत नाहीत या केवळ विचारानेच मन सैरभैर झाले आहे. जीवनातील रंग फिके वाटु लागले आहेत 😔… त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत राहु. एक मात्र निश्चित यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका दिपस्तंभासारखे एक मार्गदर्शक म्हणुन ते नेहमीच सोबत असतील.

आयुष्यात त्यांनी अनेक शिष्य घडवले, अनेकांना पैलू पाडले…पण खरेतर ‘कोहिनूर ‘ एकच होता …ते स्वतः, माझे पप्पा.. तुमचे ..शिर्के सर / सोपान काका/ सोपान मामा … अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही !!!!
…………xxxx……….

The content provided on this website is for informational and educational purposes only. The views and opinions expressed herein are personal and are intended solely for the betterment of society and nature. While we strive for accuracy and relevance, we do not make any representations or warranties of any kind, express or implied, regarding the completeness, reliability, or suitability of the information.

Any reliance you place on the information found on this website is strictly at your own risk. We shall not be held liable for any loss or damage resulting from the use of this content. Additionally, external links or references, if any, do not imply endorsement or verification of the information presented therein.

This website does not provide professional, financial, medical, legal, or technical advice. Readers are encouraged to conduct their own research or consult with experts before making decisions based on the information provided.

By using this website, you acknowledge and agree to this disclaimer.